Welcome You All

RSS

द्राक्षवेलीच्या वाढीकडे लक्ष ठेवा

सध्या पावसाळी वातावरण असल्याने द्राक्ष बागेत काही चांगल्या घडामोडी होत आहेत, तर काही ठिकाणी थोड्याफार समस्या दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये बागेत काय उपाययोजना कराव्यात याबद्दलची माहिती आजच्या लेखामध्ये घेत आहोत.

नवीन बाग :
पावसाळी वातावरणामुळे द्राक्ष बागेत आर्द्रता वाढली आहे. ती आर्द्रता वेलीच्या शाकीय वाढ होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे; परंतु हीच आर्द्रता जास्त वाढली असल्यास आणि बागेत जर पाऊस असेल, नवीन फूट वाढत असल्यास अशा वेळी बागेत रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्‍यता राहील. या बागेत पाऊस झाला असल्यास नवीन फुटींवर थोड्याफार प्रमाणात करपा दिसू शकतो. अशा परिस्थितीमध्ये तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वेळीच करपा नियंत्रण फायद्याचे राहील.
ही फूट निघत असताना आपल्याला वाढीचा जोम जास्त दिसेल. या जोमाचा फायदा व्हावा म्हणून आपण ओलांड्यावर पुन्हा दोन ते तीन काड्या मिळतील. या दृष्टीने प्रयत्न करत असतो; परंतु जर वाढीचा जोम जास्त असेल तर वेलीमध्ये जिब्रेलीन्सचे प्रमाण जास्त झाल्यास त्याचा विपरीत परिणाम घडनिर्मितीवर होऊ शकतो. पुन्हा वातावरण जर ढगाळी असेल तर घडनिर्मिती होण्याकरिता बाधा निर्माण होऊ शकते.
वेलीची वाढ चांगली व्हावी या दृष्टीने आपण नत्र व स्फुरदची पूर्तता करतो, तेव्हा दिलेले अन्नद्रव्य व त्याचसोबत वाढती आर्द्रता यामुळेच बागेत वाढीचा जोम जास्त दिसतो. अशा परिस्थितीमध्ये बागेत नत्रयुक्त खताचा वापर काही काळाकरिता बंद करावा. याचसोबत अपेक्षेप्रमाणे घडनिर्मिती होण्याच्या दृष्टीने शिफारशीत संजीवकाचा वापर या वेळी महत्त्वाचा राहील.
बऱ्याचशा बागेत या वेळी पानावर अन्नद्रव्याची कमतरता दिसून येते. रिकट घेतल्यानंतर बागेत पहिल्या वर्षी ही समस्या आढळून येते. यामध्ये लोह व मॅग्नेशिअमची कमतरता प्रामुख्याने दिसते. बागेत पाने पिवळी पडणे व पाण्याच्या कडा पिवळ्या पडणे या महत्त्वाच्या समस्या या वेळी बागेत आढळून येतात.
अन्नद्रव्यांच्या या कमतरतेमुळे बागेत वेल अशक्‍य होत असून, त्यानंतर वातावरणाचा समतोल बिघडला असल्यास रोगांचा प्रादुर्भाव जास्त वाढतो. यावर नियंत्रण ठेवण्याकरिता कमी प्रमाणात फेरस सल्फेट व मॅग्नेशिअम सल्फेटची शिफारशीत मात्रेमध्ये दोन ते तीन वेळा फवारणी करावी. त्याचसोबत जमिनीतूनसुद्धा या घटकांचा पुरवठा करावा.

जुनी बाग :
या बागेत काडी परिपक्व होत आहे. काडी तळातून दुधाळ रंगाची होत असताना काडी परिपक्वतेकडे वळली आहे, असे आपण म्हणतो. ही काडी परिपक्व होण्याच्या दृष्टीने तारेवर काड्या बांधून घेणे महत्त्वाचे समजावे. यामुळे कांड्यामध्ये गुंतागुंती होणार नाही, म्हणजेच मोकळी कॅनॉपी असेल तर त्यामध्ये हवा व सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात उपलब्ध होईल. कॅनॉपीमध्ये मिळालेले हे वातावरण काडीची परिपक्वता लवकर करून घेण्यास मदत करेल. त्याचप्रमाणे आर्द्रता कमी झाल्यास रोगांचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्‍यता कमी राहील.
या वेळी बागेत पावसाळी वातावरणामुळे नवीन फुटींची वाढ जास्त होताना दिसून येईल. ही फूट जास्त वाढल्यास अन्नद्रव्यांचा ऱ्हास होऊ शकतो. तेव्हा एकतर पालाशची पूर्तता करून काडी लवकर परिपक्व करून घ्यावी, म्हणजे वाढ थांबेल किंवा फुटी वेळीच काढून टाकाव्यात. यामुळे रोगावर नियंत्रण ठेवता येईल. जुन्या कॅनॉपीमध्ये भुरी रोगाचा जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो, तेव्हा या रोगावर वेळीच नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे राहील.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment

Text

Followers

Blogroll