Welcome You All

RSS

कापूस

कापूस पिकाला ठिबक संचाद्वारे पाणी व खते दिल्याने दोन्हींच्या खर्चात मोठी बचत होते. पिकाला गरजेनुसार पाणी देता येते. तसेच फर्टिगेशन पद्धतीने विद्राव्य खतांचा वापर करता येतो. ठिबक संचाची शेतात उभारणी करण्यापूर्वी त्यास आवश्‍यक त्या घटकांची पूर्तता करून खत व पाणी देण्याचे योग्य नियोजन करावे.

ठिबक संच शेतात उभारण्यापूर्वी पुढील आवश्‍यक घटकांची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे.

पूर्वमशागत ः संच उभारणीपूर्वी जमिनीची पूर्वमशागत करावी. उभी/ आडवी नांगरट व वखराच्या पाळ्याद्वारे जमीन भुसभुशीत करावी. भुसभुशीत जमिनीत ठिबक सिंचनाचे पाणी योग्य रीतीने पसरते. कापूस लागवडीच्या अंतरानुसार ठिबक सिंचन संचाचा आराखडा व उभारणी करावी. ठिबक सिंचन संचाची निवड करताना तडजोड करू नये. संचामध्ये नळ्यांव्यतिरिक्त फिल्टर व प्रेशर गेज हे महत्त्वाचे घटक जरूर जोडावेत.

फिल्टर अतिशय महत्त्वाचा ः इनलाईन ठिबक नळ्या तयार होत असतानाच त्यांच्या आत ठिबक तोट्या बसविलेल्या असतात, त्यामुळे इनलाईन नळ्या वरून स्वच्छ करता येत नाहीत म्हणून या पद्धतीत फिल्टरची निवड जास्त महत्त्वाची असते. सर्वसाधारणपणे जाळीचा फिल्टर हा सर्वच संचामध्ये बसविलेला असतो, मात्र पाण्याच्या गुणवत्तेनुसार इतरही फिल्टर बसविणे आवश्‍यक असते. विहिरीचे व बोअरचे पाणी असेल व कचऱ्याचे प्रमाण कमी असेल तर जाळीचा फिल्टर बसवावा. पाण्यामध्ये शेवाळे व तरंगणारे पदार्थ असतील, साचलेले पाणी असेल, तलावातील किंवा उघड्या शेततळ्यातील पाणी वापरायचे असल्यास वाळूचा फिल्टर असणे अत्यंत आवश्‍यक आहे, अन्यथा जाळीचा फिल्टर वारंवार चोक होऊन पाण्याचा पुरेसा प्रवाह संचास मिळत नाही. पाण्यातून वाळूचे, मातीचे, रेतीचे कण येत असल्यास हे कण संचात जाऊन ठिबक तोट्या बंद पडू शकतात. जुन्या बोअरवेल किंवा नवीन खोदलेल्या विहिरीतील पाण्याद्वारे असे कण येत असतात. यासाठी हायड्रोसायक्‍लॉन फिल्टर वापरावा. या फिल्टरद्वारे वाळूचे कण जास्त घनता असल्यामुळे पाण्याच्या वेगाने फिल्टरच्या बाहेर भिंतीकडे फेकले जाऊन तळाशी जमा होतात. नंतर हे कण वेगळे काढता येतात. सिंचनाच्या पाण्यात घनपदार्थ, सेंद्रिय पदार्थ व विरघळलेले क्षार कमी प्रमाणात, परंतु एकत्रितपणे असल्यास डिस्क फिल्टरची निवड करावी. या फिल्टरमध्ये प्लॅस्टिकच्या चकत्या एका नळीवर एकमेकांना चिकटून बसविलेल्या असतात. या चकत्यांवर बारीक खाचा असतात. फिल्टरमध्ये शिरलेले पाणी दोन चकत्यांमधील खाचांतून स्वच्छ होऊन बाहेर पडते. पाण्याच्या गुणवत्तेनुसार गरज पडल्यास दोन वेगवेगळे फिल्टर (उदा. ः जाळीचा व वाळूचा) एकत्रितपणे संचास बसविणे फायद्याचे असते.

प्रेशर गेज आवश्‍यक ः
प्रत्येक शेतकऱ्याने प्रेशर गेज (दाबमापक) घेणे आवश्‍यक आहे. संचामध्ये कमीत कमी दोन प्रेशर गेज असावे. एक प्रेशर गेज मुख्य पाइपलाइनवर फिल्टरच्या पूर्वी व दुसरा फिल्टरच्या नंतर बसवावा. संचाच्या आखणीनुसार संच किती दाबावर चालवायचा, फिल्टर केव्हा स्वच्छ करायचा, व्हेंचुरीद्वारे खत मिश्रित पाणी किती सोडायचे यासाठी प्रेशर गेज असण्याची गरज आहे.

इनलाईन नळ्या, ड्रीपर्सची निवड ः
संच योग्य दाबावर (साधारणत: एक कि. ग्रॅ./ वर्ग सें.मी.) सुरू नसल्यास पाण्याचे वितरण समान होत नाही व संच चालविण्याचा कालावधी ठरविल्यास त्यात चुका होऊ शकतात. ठिबक संचातील इनलाईन नळ्यांची निवड काळजीपूर्वक करावी. या नळ्या १२ मि.मी. व १६ मि.मी. मध्ये उपलब्ध आहेत. १२ मि.मी. व्यासाची इनलाईन नळी स्वस्त असते; परंतु तिची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी असते. या नळ्या वापरल्यास सबमेनवरील खर्चात वाढ होते, त्यामुळे शेताच्या आराखड्यानुसार दोन्ही प्रकारच्या (१२/१६ मि.मी.) नळ्यांद्वारे होणाऱ्या खर्चाची तुलना करून व त्याचा समन्वय साधूनच त्यांची निवड करावी. दोन ड्रीपर्समधील अंतर जमिनीच्या प्रकारानुसार निवडावे, कापसासाठी मध्यम जमिनीत दोन तोट्यांमधील अंतर ६० सें.मी. असते. तोट्यांतून बाहेर पडणारा प्रवाह साधारणत: २.२ ते ४.० लिटर प्रति तास असतो. विजेची उपलब्धता कमी वेळ असल्यामुळे अधिक प्रवाहाच्या तोट्या उपयुक्त ठरतात, यामुळे संच चालविण्याचा कालावधी कमी होतो.

लक्षात घ्या कापसाची पाण्याची गरज ः
बीटी कापसास पावसाच्या खंडाच्या दरम्यान एक किंवा दोन दिवसाआड ठिबकने पाणी द्यावे. पाणी देताना त्या दोन-तीन दिवसांचे एकत्रित बाष्पीभवन जितके असेल त्याच्या ५० टक्के इतक्‍या खोलीचे पाणी द्यावे. प्रत्येक ठिबक तोटीद्वारे किती लिटर पाणी द्यायचे हे काढण्यासाठी त्या तोटीद्वारे किती क्षेत्र भिजवायचे आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. लागवडीनंतर सुरवातीच्या काळात झाडाच्या जवळचे क्षेत्रच भिजवायचे असल्यामुळे या वेळी पाण्याची गरज कमी असते.

समजा लागवडीतील अंतर ६० १२० सें.मी. इतके असेल तर प्रत्येक झाडाने व्यापलेले क्षेत्र ०.७२ चौ. मीटर इतके होईल. प्रत्येक झाडास एक तोटी दिलेली असल्यास व एकत्रित बाष्पीभवन आठ मि.मी. असल्यास प्रत्येक झाडास साधारण तीन लिटर पाणी दोन दिवसांनी द्यावे लागेल. ठिबकची तोटी चार लिटर प्रति तास प्रवाहाची असल्यास संच ४५ मिनिटे चालवावा लागेल. याप्रमाणे लागवडीचे अंतर व नळ्याची व ठिबक तोट्यांची मांडणी यानुसार संच चालविण्याचा कालावधी काढून संचाचे नियमन करता येईल. कापूस पिकाला हवामानानुसार सहा महिन्यांच्या कालावधीत ८०० ते ९०० मि.मी. पाण्याची गरज असते. कापसाच्या हंगामात या कालावधीत साधारण ४५० ते ५५० मि.मी. उपयुक्त पावसाची नोंद होते. त्यामुळे उरलेले ३०० ते ४०० मि.मी. पाणी ठिबक सिंचनाद्वारे द्यावे लागेल. बऱ्याचदा हंगामानंतरही काही बोंडे हिरवी असल्यामुळे पीक राखले जाते. अशावेळी झाडावरील बोंडांची संख्या, त्यापासून मिळणारे उत्पादन, कापूस वेचण्यासाठी मजुरांची उपलब्धता व कापसाचा बाजारभाव इ. बाबींचा विचार करून पीक सांभाळावे. अशावेळी ठिबकद्वारे उर्वरित हंगामासाठीही बोंडे भरण्यासाठी पाणी देणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात पाणी कमी असल्यास बागायती बीटी कापसाची लागवड मे महिन्यात न करता २० जूनपर्यंत केली तरी फायद्याचे ठरते.

खत व्यवस्थापन :
बीटी कापसाला साधारणपणे १००:५०:५० किलो प्रति हेक्‍टरी नत्र, स्फुरद व पालाशचा वापर करावा. पिकाच्या हंगामाचा कालावधी लांबणार असल्यास (१८० दिवसांपेक्षा जास्त) यामध्ये ३० ते ५० टक्के वाढ करावी. याशिवाय हंगामापूर्वी मातीची तपासणी करून मातीत उपलब्ध अन्नद्रव्यांच्या प्रमाणात वरील मात्रेमध्ये गरजेनुसार बदल करावा. सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी असल्यास आवश्‍यकतेनुसार त्यांचा वापर करावा. साधारणत: ६० ते ७० दिवसांनंतर मॅग्नेशिअम सल्फेट २५ ते ४० किलो प्रति हेक्‍टर या प्रमाणात वापर करावा. लागवडीपूर्वी उपलब्धतेनुसार शेवटच्या पाळीपूर्वी कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. प्रवाही सिंचन पद्धतीने पाणी द्यायचे असल्यास तक्ता क्र. १ प्रमाणे खतांचे वेळापत्रक ठरवावे.

ठिबकद्वारे खते देण्याचे तंत्र ः
ठिबक संचाद्वारे खते देणेच जास्त योग्य असते. या प्रक्रियेस फर्टिगेशन म्हणतात. खते देण्यासाठी व्हेंचुरीचा वापर जास्त सोयीचा आहे. खतमिश्रित पाण्यात व्हेंचुरीचे एक टोक सोडून दुसरे टोक मुख्य पाइपला जोडले जाते व मुख्य पाइपवरील व्हॉल्व्हच्या साहाय्याने खतामधील पाणी मुख्य प्रवाहात सोडता येते. पाण्यात विरघळणारी सर्व खते या प्रक्रियेने पिकांना देता येतात. यासाठी संचासोबत व्हेंचुरी व बायपास असेंब्ली व्हॉल्व्हसह घेण्यासाठी दोन ते पाच हजार रुपये खर्च येतो.

ठिबक सिंचनाद्वारे पाणी व खतांची वापर कार्यक्षमता वाढविण्यासाठी विद्राव्य खतांचा वापर करणे अधिक फायद्याचे आहे. विद्राव्य खते उपलब्ध होत नसल्यास पारंपरिक खतांपैकी युरिया, पांढरा पोटॅश किंवा चांगल्या प्रतीचा म्युरेट ऑफ पोटॅश पाण्यात संपूर्ण विरघळत असल्यामुळे ठिबक संचातून द्यावा. ठिबकद्वारे खतांची मात्रा अनेक वेळा विभागून देता येते. खते एक दिवसाआड देणे शक्‍य नसल्यास, आठवड्यातून / पंधरवड्यातून एकदा द्यावे. यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होऊन दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते. तक्ता क्र. २ मध्ये विद्राव्य खतांचे कापसासाठीचे वेळापत्रक दिलेले आहे. पिकाची कालावधी १८० दिवसांपेक्षा जास्त असल्यास १३५ दिवसांपर्यंत खते देण्यासाठी खतांच्या मात्रेत २० ते ३० टक्के वाढ करावी.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment

Text

Followers

Blogroll