Welcome You All

RSS

द्राक्षवेलीच्या वाढीकडे लक्ष ठेवा

सध्या पावसाळी वातावरण असल्याने द्राक्ष बागेत काही चांगल्या घडामोडी होत आहेत, तर काही ठिकाणी थोड्याफार समस्या दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये बागेत काय उपाययोजना कराव्यात याबद्दलची माहिती आजच्या लेखामध्ये घेत आहोत.

नवीन बाग :
पावसाळी वातावरणामुळे द्राक्ष बागेत आर्द्रता वाढली आहे. ती आर्द्रता वेलीच्या शाकीय वाढ होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे; परंतु हीच आर्द्रता जास्त वाढली असल्यास आणि बागेत जर पाऊस असेल, नवीन फूट वाढत असल्यास अशा वेळी बागेत रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्‍यता राहील. या बागेत पाऊस झाला असल्यास नवीन फुटींवर थोड्याफार प्रमाणात करपा दिसू शकतो. अशा परिस्थितीमध्ये तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वेळीच करपा नियंत्रण फायद्याचे राहील.
ही फूट निघत असताना आपल्याला वाढीचा जोम जास्त दिसेल. या जोमाचा फायदा व्हावा म्हणून आपण ओलांड्यावर पुन्हा दोन ते तीन काड्या मिळतील. या दृष्टीने प्रयत्न करत असतो; परंतु जर वाढीचा जोम जास्त असेल तर वेलीमध्ये जिब्रेलीन्सचे प्रमाण जास्त झाल्यास त्याचा विपरीत परिणाम घडनिर्मितीवर होऊ शकतो. पुन्हा वातावरण जर ढगाळी असेल तर घडनिर्मिती होण्याकरिता बाधा निर्माण होऊ शकते.
वेलीची वाढ चांगली व्हावी या दृष्टीने आपण नत्र व स्फुरदची पूर्तता करतो, तेव्हा दिलेले अन्नद्रव्य व त्याचसोबत वाढती आर्द्रता यामुळेच बागेत वाढीचा जोम जास्त दिसतो. अशा परिस्थितीमध्ये बागेत नत्रयुक्त खताचा वापर काही काळाकरिता बंद करावा. याचसोबत अपेक्षेप्रमाणे घडनिर्मिती होण्याच्या दृष्टीने शिफारशीत संजीवकाचा वापर या वेळी महत्त्वाचा राहील.
बऱ्याचशा बागेत या वेळी पानावर अन्नद्रव्याची कमतरता दिसून येते. रिकट घेतल्यानंतर बागेत पहिल्या वर्षी ही समस्या आढळून येते. यामध्ये लोह व मॅग्नेशिअमची कमतरता प्रामुख्याने दिसते. बागेत पाने पिवळी पडणे व पाण्याच्या कडा पिवळ्या पडणे या महत्त्वाच्या समस्या या वेळी बागेत आढळून येतात.
अन्नद्रव्यांच्या या कमतरतेमुळे बागेत वेल अशक्‍य होत असून, त्यानंतर वातावरणाचा समतोल बिघडला असल्यास रोगांचा प्रादुर्भाव जास्त वाढतो. यावर नियंत्रण ठेवण्याकरिता कमी प्रमाणात फेरस सल्फेट व मॅग्नेशिअम सल्फेटची शिफारशीत मात्रेमध्ये दोन ते तीन वेळा फवारणी करावी. त्याचसोबत जमिनीतूनसुद्धा या घटकांचा पुरवठा करावा.

जुनी बाग :
या बागेत काडी परिपक्व होत आहे. काडी तळातून दुधाळ रंगाची होत असताना काडी परिपक्वतेकडे वळली आहे, असे आपण म्हणतो. ही काडी परिपक्व होण्याच्या दृष्टीने तारेवर काड्या बांधून घेणे महत्त्वाचे समजावे. यामुळे कांड्यामध्ये गुंतागुंती होणार नाही, म्हणजेच मोकळी कॅनॉपी असेल तर त्यामध्ये हवा व सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात उपलब्ध होईल. कॅनॉपीमध्ये मिळालेले हे वातावरण काडीची परिपक्वता लवकर करून घेण्यास मदत करेल. त्याचप्रमाणे आर्द्रता कमी झाल्यास रोगांचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्‍यता कमी राहील.
या वेळी बागेत पावसाळी वातावरणामुळे नवीन फुटींची वाढ जास्त होताना दिसून येईल. ही फूट जास्त वाढल्यास अन्नद्रव्यांचा ऱ्हास होऊ शकतो. तेव्हा एकतर पालाशची पूर्तता करून काडी लवकर परिपक्व करून घ्यावी, म्हणजे वाढ थांबेल किंवा फुटी वेळीच काढून टाकाव्यात. यामुळे रोगावर नियंत्रण ठेवता येईल. जुन्या कॅनॉपीमध्ये भुरी रोगाचा जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो, तेव्हा या रोगावर वेळीच नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे राहील.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सेझ आणि शेतकरी

ह्या देशाला शेतकऱ्यांची नव्हे तर औद्योगिक कामकऱ्यांची गरज आहे. देशातील ६०% हून अधिक लोक शेतात काम करतात (आणि त्यातही ४०% लोकांना फक्त एकाच हंगामात काम मिळते!). हे सगळे हात देशाच्या आर्थिक समृद्धिला हातभार लावायला असमर्थ आहेत कारण रोजगार निर्माण करण्याच्या नावाखाली शेतजमिनीच्यामालकांना सरकार वाटेल त्या सवलती देते, पण ह्या सवलती घेउनही शेताचे उत्पादन वाढत नाही. अणि कसे वाढणार उत्पादन? देशाची लोकसंख्या गेल्या ६० वर्षात दुपटीहून अधिक झाली, पण शेतजमीन काही वाढली नाही. शिवाय काम करणाऱ्यांपेक्षा काम मागणारे अधिक असल्यामुळे त्यांचे शोषण चालू आहे. अमेरिकेत लोकसंख्येच्या फक्त २% लोक शेतात काम करतात, आणि तरीही अमेरिकेचे धान्य उत्पादन भारतापेक्षा जास्त आहे. ह्याचे कारण असे की जमिनीचे छोटे छोटे तुकडे करून जर शेती केली तर ती किफायती ठरत नाही. धान्याबरोबरच ह्या देशाला इतर साधनसामुग्रीचीही गरज आहे, पण ती निर्माण करण्यासाठी पुरेसे उद्योगधंदे आणि तंत्रज्ञान देशाकडे नसल्यानेह्या गोष्टी बाहेरून आयात कराव्या लागतात. शेतावर राबणारे हे हात जर जर औद्योगिक कामाकडे वळवले तर देशाची परिस्थिती सुधारेल. औद्योगिक क्षेत्रात देशातले १२% लोक काम करतात आणि देशाचे जवळजवळ ३०% उत्पन्न (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) काढतात. ह्याउलट, शेतकी व्यवसायात देशातले ६०% हून अधिक लोक काम करतात आणि केवळ १७% उत्पन्न काढतात. यावरून हे दिसून येईल की शेतावर काम करणाऱ्या मजुरांपेक्षा, औद्योगिक मजुरांची उत्पादन क्षमता काही पटींनी अधिक आहे. सोपा हिशेब आहे: देशातल्या ४०% शेत कामकऱ्यांना जर औद्योगिक क्षेत्राकडे वळवले तर देशाचे उत्पन्न ३ पटींनी वाढेल. अर्थात हे काही एका दिवसात होणार नाही, पण गेल्या ६० वर्षात नक्कीच करता आले असते. पण गांधीजींच्या भोंगळ कल्पनांमध्ये गुंतून देशाने आपले नुकसान करून घेतले आहे. शिवाय औद्योगिकीकरणामुळे शोषणही कमी होते, कारण औद्योगिक क्षेत्रात काम करणारा वर्ग संघटीत आहे (लेबर युनियन्स), पण शेतमजुरांचे असे संघटन फार कमी प्रमाणावर बघायला मिळते.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

शेतकर्‍याला गाय

“कोकणी शेतकर्‍याला गाय ही आपल्या देवी सारखी वाटतेच पण तो मुका प्राणी आपल्या आई सारखाही वाटत असतो. म्हणून जरी गाई म्हातार्‍या झाल्या आणि त्यांचा दुध देण्यासाठी काहीही उपयोग नाही असं जरी झालं तरी गाईंना आम्ही त्या मरेपर्यंत पोसतो.”
त्याचं असं झालं,आमच्या बिल्डींगच्या खाली धनाजी जाधवांचं फळाचं दुकान आहे हे धनाजी खंभिररावांचे धाकटे भाऊ.कोकणातून येणारा फळांचा आणि भाज्यांचा माल जाधव आपल्या दुकानात ठेवतात.आंब्या फणसाच्या मोसमात कोकणातून ट्रक भर-भरून माल आणून ह्या दुकानात विकला जातो.अलीकडे तर रोजच एक दोन ट्रकांची कोकणातून येण्या-जाण्यात फेरी होत असल्याने, चाफ्याची,आबोलीची,मोगर्‍याची ताजी फुलं,तसंच गणपतिच्या सणात कमळाची,आणि लाल रंगाची ताजी फुलं पण आणून ठेवतात. हार-वेण्या करण्यासाठी फुलं विकत घेण्यासाठी फुलवाल्यांची दुकानात रोजचीच गर्दी असते.
एकदा गप्पा मारत असताना जाधव मला म्हणाले,
“केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा मला सांगा.परतीच्या ट्रकात बसून आपण माझ्या बरोबर या. कोकणात जाऊंया. माझ्या भावाची छोटीशीच शेती आहे.तुम्हाला त्यांचं जीवन पहायला मजा येईल.”
आणि तो दिवस उजाडला.मी धनाजीबरोबर दोन चार दिवस रहायला त्यांच्या भावाच्या गावी गेलो होतो.
“आमच्या पूर्तिच शेती करायला मला आवडतं.मी आणि माझी बायको ह्या शेतावर मेहनत घेतो.आमच्या मेहनतीच्या पैशाने हे शेत आणि थोडी गुरं आम्ही विकत घेतली.हा सारा व्याप सांभाळताना आम्ही आमच्या दोन मुलांची जोपासना पण करीत असतो.”
खंभिरराव जाधव,मला माहिती देत होते.
दुसर्‍या दिवशी मी खंभिररावांच्या शेतावर फेरफटका मारायचं ठरवलं होतं.त्याशिवाय त्यांच्या गाईच्या दुधाच्या व्यवसायचं त्यांच्या भावाकडून ऐकलं होतं,त्याचंही कुतूहल माझ्या मनात होतं.ते पण पहाणार होतो.आणि वेळ मिळेल तेव्हा खंभिररावांशी गप्पा मारून माहिती काढायचं ठरवलं होतं.
शेतीची आणि त्याशिवाय दुधदुभत्याची कामं हाती घेतल्यावर ह्या व्यवसायात माणूस दिवसाचे चौविस तास व्यस्त असतो हे मला माहित होतं.
पण त्यांच्याच तोंडून ऐकण्यासाठी मी जाधवांना म्हणालो,
“हा शेतीचा धंदा असा आहे की तुमच्या रोजी-रोटीवर होत असणारे परिणाम बाह्य कारणावर अवलंबून असतात. आणि त्यावर तुमचं कसलही नियंत्रण नसतं.हवामान हा एक मोठा मुद्दा असतो.हे सर्व बाह्य परिणाम जेव्हा तुमच्या विरूद्ध जातात तेव्हा शेतीचा धंदा निमूट चालण्यात जास्त किफायतशीर असतो असं मी ऐकलं आहे ते खरं काय?”.
खंबिरराव हंसत हंसत मला म्हणाले,
“खूप थकायला होत असणार नाही काय?”
असं शेती न करणारी आमची मित्रमंडळी आम्हाला विचारतात.
माझं म्हणणं, खरंच थकायला होत असतं.
पहाटे चारला उठण्याचा प्रघात दिवसानी -दिवस ठेवावा लागतो.
पण यातही अभिमान वाटण्याची समाधानी आणि आमच्या स्वमेहनतीमुळे हे घडतंय हे पाहूनच आमचा मार्ग चाललेला असतो.”
मी म्हणालो,
“ह्या नकारात्मक वृत्तिने भरलेल्या समुद्रात शेती नकरणारे हे लक्षात का आणू शकत नाहीत हे कळायला जरा कठीणच जातं.”
“ह्या व्यवसायात फार मोठ्या प्रमाणात शेती असताना सहभाग घेणार्‍यांना खूपच कष्ट पडत असतील यात वाद नाही. परंतु,आम्ही सांभाळतो तसं छोटंसं शेत सांभाळण्याचा आनंद अवर्णनीय आहे. हा व्यवसाय एव्हडा हाडां-मासांत खिळलेला असतो की काहीतरी गोष्ट करीत राहाण्याशिवाय गत्यंतरच नसतं.हा व्यवसाय करताना पैशावर डोळा ठेऊन आम्ही करीत नाही.आंतरीक इच्छेमुळे आम्ही त्यात आहोत.”
खंभिररावानी आपलं प्रांजाळ मत दिलं.
“गाईच्या दुधाच्या व्यवसायाचा व्याप कसा असतो हो?”
मी खंभिररावांना लगेचच विचारलं.
“तेही तितकंच कटकटीचं असतं,पण कुठच्याही कामावर प्रेम असल्यानंतर त्याची कटकट भासत नाही.उलट उमेद येते.”
खंभिरराव सांगायला लागले.
“सकाळीच उठून गाईंच्या आंचूळ्या धूवून मग दूध काढताना दुधाच्या आठ-दहा चरव्या भरून निघाल्यावर संतुष्ट होण्यात इतकं समाधान वाटतं की काय सांगावं.ह्या गुरांना खाणं-पिणं व्यवस्थीत गेल्याने दुधाचा रतीब वाढतो. आपल्या आईचं दुध लुचून लुचून, पाडसं गुबगुबीत होतात.आणि वयात आल्यावर गाभण राहून मग विहिल्यानंतर परत दुधाच्या पुरवठ्यात भर टाकायला मदत करतात.
काही गाई भाकड झाल्यावर गुराख्याबरोबर माळावर चरायला पाठवल्यावर उरलेल्या दुभत्या गाई दुधाची उणीव भरून काढतात.”
भाकड गाईंबद्दल मला बर्‍याच शंका होत्या.आणि काही अपसमजही मी ऐकले होते.प्रत्यक्ष शेतकर्‍याच्या तोंडून “फ्रॉम हॉरसीस माऊथ” म्हणतात तसं होईल म्हणून मी जाधवांना विचारलं,
“ह्या भाकड गाई नंतर कसायाकडे दिल्या जातात, असं मी ऐकलं होतं.किती खरं आहे?”
“छे,छे! कुणी सांगीतलं तुम्हाला?”
माझ्या प्रश्नाने जाधव जरा वैतागल्या सारखे मला वाटले.
मला म्हणाले,
“कोकणातला शेतकरी हे पाप कधीच करणार नाही.गाईला देवी कशी मानली जाते.गाई भाकड झाल्या तरी काय झालं? ती गाईची तात्पुरती अवस्था असते.गुराख्याकडे भाकड म्हणून दिलेल्या गाई त्यांचा फळायचा मोसम आल्यावर त्या फळल्या जातात. एखाद दुसरी गाय सोडल्यास उरलेल्या गाई गाभण राहिल्या हे ऐकून पुढच्या मोसमात जादा दुधाच्या चरव्या भरणार ह्याचा विचार आमच्या मनात येऊन चार पैसे गाठीला जमतील मुलांना
दिवाळीत नवीन कपडे घेता येतील याची जाणीव होऊन आम्हा दोघां नवरा-बायकोना मेहनतीचं सार्थक होतंय हेच उलट तृप्तिचं कारण बनतं.”
असा प्रश्न का केला ह्याचा संदर्भ देताना मी जाधवांना म्हणालो,
“वांद्र्याला फार पूर्वी कसाईखाना होता.आता तो तिकडून उचकटून टाकला आहे.त्या दिवसात बाहेर गावाहून गुरांचा कळप मुंबईला कत्तल खान्यात घेऊन यायचे हे मी पाहलंय.ती गुरं कुठून यायची ह्याची कल्पना नाही.”
“त्या गुरांच्या कळपाचं मला काही माहित नाही.”
असं म्हणून खंभिरराव मोठ्या अभिमानाने आणि सद्गदीत होऊन सांगू लागले,
“कोकणी शेतकर्‍याला गाय ही आपल्या देवी सारखी वाटतेच पण तो मुका प्राणी आपल्या आई सारखाही वाटत असतो. म्हणून जरी गाई म्हातार्‍या झाल्या आणि त्यांचा दुध देण्यासाठी काहीही उपयोग नाही असं जरी झालं तरी गाईंना आम्ही त्या मरेपर्यंत पोसतो.
खाण्या पिण्यात त्यांची यत्किंचही आबाळ करीत नाही.आणि दुर्दैवाने त्या म्हातार्‍या गाई निर्वतल्या तरी आम्ही शेताच्या बाहेर माळरानावर खड्डा करून पुरतो.अक्षरशः घरातलं माणूस गेल्या सारखं शेतकर्‍याला दुःख होतं.दोन दिवस आम्ही उपास केल्यासारखे रहातो.त्यावर्षी आम्ही सणसोहळा सुद्धा करीत नाही.घरातली लहान मुलं सुद्धा दुर्मुखलेली रहातात.गेलेल्या गाईचं कातडं पायतानासाठी वापरायला महार-चांभार पूर्वी यायचे.पण पैशासाठी
म्हणून सुद्धा कोकणी शेतकरी गरीब झाला म्हणून ह्या मार्गाला जाणार नाही.”
चर्चा बरीच अशी भावूक होत आहे असं पाहून मी जरा विषय बदलण्याचा विचार करून जाधवांना म्हणालो,
“शेती कामात अवजारं वापरायची झाली म्हणजे त्यात दुरूस्थी-नादुरूस्थीच्या कटकटी आल्याच.पण ती अवजारं पुन्हा वापरण्याच्या स्थितीत आणल्यावर मनःशांती मिळते ती वेगळीच असते.तुम्हालाही तसं होत असेल नाही काय?”
“मनःशांती,आनंद,समाधानी आणि उत्कंठा असले प्रकार शेतकर्‍याच्या जीवनात येतच असतात.”
खंभिररावानाही मी विषय बदलल्याचं जाणवलं असावं.
मला म्हणाले,
“दोनचार कुंणग्यात भातशेती रोवून पिकं आल्यावर जमा केलेला तांदूळ गोण्या भरून मांगरात रचून ठेवायला आनंद होतो.शेती संपल्यावर त्याच जागेत मिरची,डांगर भोपळे,मुळा अशी भाजीची पिकं काढायला,आमचा आवर बेताचाच असल्याने मेहनत घ्यायला परवडतं.
कामं अजिबात न संपणार्‍या ह्या व्यवसायात काहीतरी संपादन केलं ह्याची समाधानी औरच असते.मग ते काम तांदळाची तूसं काढण्याचं असो किंवा गायरीतलं खत उपसून कुंणग्यात पसरवण्याचं असो, कशाचाही आधाराने, कोणतही काम त्या मोसमापुरतं झालं म्हणजे फत्ते.हवामान खात्याने दिलेलं भाकित खोटं ठरून येणारं वावटळीचं वादळ पुर्वेच्या दिशेने निघून गेल्याचं पाहून सुटकारा मिळाल्यावर मनही प्रफुल्लीत होतं.”
चर्चेचा शेवट आनंदात होतोय असं पाहून मी खंभिररावाना म्हणालो,
“आणि सर्वात उत्तम गोष्ट ही की तुमची मुलं रोज तुमच्या सहवासात असतात ह्याचं महत्व किती मोठं आहे.मेहनतीची फळं मिळाल्याचं पाहून त्यांना परिश्रमाची मुल्यं कळतात हे पाहून तुमचं समाधान होत असेल हे ही तितकंच महत्वाचं आहे.आणि तुमच्या मुलांच्या तोंडात आरोग्यजनक आणि पौष्टीक अन्न पडतं हे तुमच्या मेहनतीचं फळ आहे असं तुमच्या मुलांना वाटणं हे ही खूप समाधानाचं आहे.
अगदी खूश होऊन जाधव मला म्हणाले,
“म्हणूनच मला शेती आवडते.”
दुसर्‍या दिवशी आणि माझ्या पुर्‍या मुक्कामात मी,खंभिरराव आणि त्यांचे धाकटे बंधू धनाजी यांच्यासह मनसोक्त पाहूणचार घेतला हे सांगायला  नकोच.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Text

Followers

Blogroll